कोलकाता-पुणे-मुंबई असा आजवरचा प्रवास झालाय माझा. बालपणी कोलकात्याच्या आमच्या घरासमोरच इवलंसं दुकान होतं हलवायाचं. ३.३० वाजता शाळा सुटली, की आईला मस्का मारून पैसे मिळवायचो. पानाच्या द्रोणात तिथला सामोसा खायचो. शिंगाडा म्हणतात त्याला. फरसबी-बटाट्याच्या भाजीला जिऱ्याची खमंग फोडणी दिलेला शिंगाडा खायची हौस मी मुंबईत दुर्गापूजेला पूर्ण करतो. तिथं नवा गूळ आला, की तो वापरून 'संदेश' बनवतात. इतका अफलातून, की नेमक्या शब्दांत वर्णनसुद्धा करता येणार नाही.
पाणीपुरी हासुद्धा माझा वीक पॉइंट. कदाचित विश्वास नाही बसणार; पण १० पैशांना दहा पुऱ्या मिळायच्या त्यावेळी. पुचका म्हणतात तिथं पाणीपुरीला. पुढे पुण्याला आजीकडे होतो शिकायला. पुण्यात मिळणाऱ्या एक सो एक थाळ्या मला आजही प्रेमात पाडतात. 'सपना', 'अशोका'मधील थाळी माझी विशेष लाडकी. 'वैशाली'मधला डोसा, इडली, वाफाळतं सांबार माझं ऑल टाइम फेव्हरिट. पार्ल्याला 'गजाली'त चिंबोरीचं सूप आणि दाल खिचडी माझा आवडता मेन्यू. आईच्या हातच्या पदार्थांची सर कुठंही नाही. माझा फेव्हरिट मेन्यू म्हणजे जिरा आलू आणि साधं वरण फुलका. माझी बायको, मानसी गोडाचा उत्तम शिरा करते. उडपी हॉटेललाही लाजवेल असे कुरकुरीत पेपर डोसेही ती करते. यामुळे माझ्यातला खवय्या तृप्तीनंच गार होतो.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट