प्रत्येक गृहिणीला घरात वेगवेगळे पदार्थ बनवण्याची आवड असते. हे पदार्थ बनवताना काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या, तर आपण अनेक पदार्थ रुचकर आणि स्वादिष्ट बनवू शकतो.
कांद्याची भजी कुरकुरीत होण्यासाठी कांदा चिरल्यावर त्याला मीठ चोळून ठेवावं. दहा ते पंधरा मिनिटांनंतर भजी तळावीत. वडा, पुरी, भजी तळण्यापूर्वी तेलात किंवा तुपामध्ये एक छोटा चमचा मीठ टाकावं. यामुळे पदार्थ तेलकट होत नाहीत. तांदळाची खिचडी करताना अर्धा तास आधी तांदूळ धुवून ठेवा आणि तुपात परता. यामुळे खिचडी मऊ होते. आमटी किंवा रस्सा रंगतदार होण्यासाठी टोमॅटो उकडून त्यावरची साल काढून टोमॅटोचा गर त्यामध्ये घाला. दुधाला विरजण लावताना त्यामध्ये तुरटी फिरवावी. यामुळे दही घट्ट होते. कारलं कापून त्याला मीठ लावून अर्धा तास ठेवल्यास त्याचा कडूपणा कमी होतो. भात शिजवताना तांदळात पाण्यासोबत लिंबू आणि मीठ घालावं. भात मोकळा आणि पांढराशुभ्र होतो. तूप कढवताना चिमूटभर मीठ आणि चिंचोक्याएवढा गूळ घालावा. तुपाला चांगली कणी येते. लोणी, तूप शिळे झाल्यामुळे वास येत असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा मिसळून ती बरणी अर्धी बुडेल अशी पाण्यामध्ये ठेवा. वड्या, लाडू, पाकातील पुऱ्या असे गोड पदार्थ करताना साखरेच्या पाकामध्ये थोडं दूध घालावं. पदार्थ अलवार आणि चवदार होतात.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट