Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 1266 articles
Browse latest View live

उन्हाळी मेवा

$
0
0


महेश विचारे

उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या की, बैठ्या घरांच्या कौलांवर, इमारतींच्या गच्चीवर, पाण्याच्या टाकीवर स्टीलच्या ताटांमध्ये सुकत ठेवलेल्या पोळ्या आपलं लक्ष वेधून घेतात. त्यासोबत असे अनेक पदार्थही कधी पातळ अशा कपड्यांवर, चादरींवर ठेवलेले दिसतात. उन्हाळ्यात अशा पदार्थांची नेहमीच रेलचेल असते.

आता शहरात घरगुती तयार केलेले खाद्यपदार्थ फारसे पाहायला मिळत नाहीत तसंच त्याबद्दलचं तेवढं आकर्षणही राहिल्याचं दिसत नाही. कारण जमानाच बदलला आहे. आज आंबा पोळी, फणस पोळी, मुरंबे, लोणची असे पदार्थ तयार मिळत असल्यामुळे ते घरी करून पाहण्याची तसदीही कोणी घेत नाही, असे पदार्थ बनविण्याची परंपराही मागे पडत चाललेली दिसते. तरीही उन्हाळ्यात हे पदार्थ बनविण्याची परंपरा काही ठिकाणी विशेषतः गावात सुरूच असते. बाहेर उपलब्ध असले, तरी घरात बनविलेल्या या पदार्थांची चव काही औरच असते. त्यामुळे जिथे चाळी, बैठी घरं, छोट्या इमारती आहेत, अशा ठिकाणी हे पदार्थ अजूनही सुकत घातल्याचं दिसतं.

आंबापोळी

उन्हाळ्याचे दिवस म्हणजे आंबा- फणसाचा हंगाम. शाळांना सुट्ट्या लागल्या की, अनेकांचे पाय वळतात ते गावाकडे. विशेषतः कोकणात आंब्यांपासून बनणाऱ्या अनेक पदार्थांची चव चाखण्याची संधी यानिमित्ताने मिळते. घरात बनवलेले, रासायनिक प्रक्रिया किंवा पदार्थांची सरमिसळ न केलेले पदार्थ खाण्यात वेगळीच मजा असते. त्यातच घरच्याच कलमांचे किंवा रसाचे आंबे मिळाले तर पर्वणीच. घरात साठवून ठेवलेल्या या आंब्यांपासून मग साठं बनवायला सुरुवात होते. काही आंबे खाण्यालायक नसतात. मार लागलेले, थोडे खराब झालेले आंबेही अशी साठं घालायला उपयुक्त ठरतात. त्यांचा खाण्यालायक भाग वेगळा करून त्याच्या रसापासून ही साठं तयार करता येतात. दुकांनामध्ये मिळत असलेल्या आंबापोळ्यांमध्ये साखरेचं प्रमाण अधिक असतं. शिवाय, बराच काळ टिकविण्यासाठी त्यात रसायनंही घातलेली असतात. अर्थात, त्यांच्या चवीत तोचतोचपणा असतो. त्यामुळेच केवळ आंब्याच्या रसापासून घरातच बनवलेली साठं खाण्याची मजा वेगळीच असते.

कृती - हापूस अथवा रसाच्या आंब्यांपासून रस काढून घ्यावा. त्यात वेलची पूड, थोडं मीठ, साखर टाकून तो रस स्टीलच्या थाळीला तूप लावून कडक उन्हात सुकत ठेवावा. त्यावर एखादा पातळ कपडा टाकावा. वरचा भाग सुकल्यानंतर पोळी उलट करून पुन्हा उन्हात सुकण्यासाठी ठेवावी. चांगली सुकल्यानंतर त्याचे छोटे भाग करावेत आणि प्लॅस्टिक पिशवीत ‌किंवा चपट्या स्टीलच्या डब्यात बंद करून ठेवावेत.

खास आमरस

आमरस आता १२ महिने उपलब्ध असतो. विशेषतः सणासुदीला, लग्नाच्या हंगामात याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. तरीही आंब्याच्या हंगामात घराघरात हा रस बनविण्याची परंपरा आहेच. रसाचे आंबे क‌िंवा हापूस आंब्यांपासून हा रस बनवणं अगदी सोपं असतं. फ्रीजमध्ये थंड करून चपाती किंवा पुरीसोबत या रसाचा आस्वाद घेता येतो.

कृती - चार ते पाच हापूस आंबे किंवा ७-८ आंबे छोटे रसाचे आंबे घेऊन ते पिळून घ्यावेत. त्याआधी, त्यांचे देठ काढून त्यातला चीक स्वच्छ करणे आवश्यक. घशाला तो त्रासदायक ठरतो. आंब्याचा रस घेतला की, त्यात थोडी साखर, मीरपूड, केसर वगैरे टाकून तो फ्रीजमध्ये थंड करायला ठेवावा. हापूस आंबे असतील, तर त्यातील गर थोडा जाड असतो. तो व्यवस्थित पातळ करून घेता येईल. पण आमरसात थोडा घट्टपणा असला पाहिजे.

फणसपोळी

कोकणात आंब्याच्या सोबतीला सगळे जरूर आस्वाद घेतात तो फणसांचा. विशेषतः घराभोवती फणसाची अनेक झाडे असल्याने हमखास फणस खायला मिळतो. त्यातल्या बरक्या फणसापासून केलेल्या फणस पोळ्या उन्हाळ्याच्या दिवसात खायला मिळतात. दुकानात आंबापोळी हमखास मिळत असली, तरी फणसपोळीची तेवढी क्रेझ नसावी. पण आंबापोळीप्रमाणेच फणसपोळी खाण्यातही वेगळी मजा आहे.

कृती - फणसातले रसरशीत गरे काढून त्यातल्या बिया म्हणजे आठळ्या बाजूला काढाव्या आणि त्या गऱ्यांचा रस चांगला पिळून ताटात काढून घ्यावा. त्यात थोडी साखर घालून ताटात पसरावा आणि उन्हात ही पोळी सुकवावी.

या फणसातल्या आठळ्यांचाही उपयोग आहेच. सुकवलेल्या आठळ्या भाजून खाता येतात तसेच त्या उकडूनही त्यांची चव चाखता येते. आठळ्यांची भाजीही छान होते. फणसाच्या हंगामात ही मजा लहानमोठ्यांना नक्की घेता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरीच करा सरबतं...

$
0
0

आशा क्षीरसागर

उन्हाळा सुरू होताच घरोघरी आठवणीनी थंड पेय आणली जातात. घराबाहेर जाताना किंवा उन्हातून आल्यानंतर थंडगार पदार्थ पोटात गेले की मन प्रफुल्लित होते. उन्हाळ्यात घरी आलेल्यांसाठीही चहा, कॉफीऐवजी सरबत दिले जाते. बाजारात विविध प्रकारची सरबतं, ज्युस उपलब्ध असतात. परंतु, अनेकदा ती जुनी असतात. आपल्या घरीच ताजी फळं आणून सरबतं तयार करता येतात. ही सरबतं घरीच तयार करत असल्यामुळे त्यात ताजेपणा राहतो. शिवाय ती आरोग्यदायीसुद्धा होतात. पैशांची बचत होते आणि समाधानही मिळते.
संत्र्याचे सरबत

साहित्य - १ किलो संत्री

कृती - संत्र्याच्या फोडी करुन त्या शिजवाव्या. फोडींच्या दुप्पट साखर टाकून हे मिश्रण मंद आचेवर घट्ट होऊ द्यावे. थंड झाले की हे मिश्रण बाटलीत ठेवावे व आवश्यकतेनुसार पाणी टाकून ते प्यावे.

आंब्याचे आइस्क्रीम

कृती - मोठ्या आंब्यांचा गर काढावा व तो मिक्सरमधून काढून घ्यावा. हा गर पातेल्यात टाकून त्यात दूध व कस्टर्ड पावडर टाकावी. हे मिश्रण पूर्णपणे एकजीव करावे आणि फ्रीजरमध्ये ठेवावे. साधारण तीन तासांत आइस्क्रीम तयार होईल.

सफरचंदाचे सरबत

साहित्य - ताजी सफरचंद

कृती - चांगल्या दर्जाच्या सफरचंदांचे तुकउे करावे. हे तुकडे पाण्यात टाकून शिजू द्यावे. नंतर मिक्सर मधून काढून घ्यावे. त्यात दुप्पट साखर घालावी. हे मिश्रण मंद आचेवर घट्ट होऊ द्यावे. थंड झाल्यावर त्यात व्हिनेगर व व्हॅनिला घालावे.

सुधा रस

साहित्य - लिंबू, साखर

साहित्य - २५ ताजी लिंबं घ्यावी. त्यांच्या बिया काढून रस गाळून घ्यावा. जितका रस असेल त्याच्या साधारण तिप्पट साखर टाकावी व हे मिश्रण गॅसवर घट्ट होऊ द्यावे. थंड झाल्यावर बरणीत भरुन ठेवावे. प्यायच्या वेळी या मिश्रणात पाणी टाकून सर्व्ह करावे.

बोरांचे सरबत

साहित्य - ताजी मोठी बोरे, साखर, मीठ

कृती - प्रथम बोरं धुवून घ्यावी. ती कुकर मध्ये उकडावी. उकडलेल्या बोरांच्या बीया काढून टाकाव्यात. उर्वरीत मिश्रणात तीन वाट्या साखर टाकावी. घट्ट होईपर्यंत शिजवावे. थंड झाल्यावर बरणीत भरावे. पाणी टाकून हे सरबत पिता येते.

दुधाची कुल्फी

कृती - २ लीटर दूध घ्यावे गरम करायला ठेवावे. लासर रंग येईपर्यंत ते आटू द्यावे. त्यात काजू, पिस्ता आणि बदामाचा कुट घालावा. हे मिश्रण पूर्णपणे एकजीव झाले की त्यात साखर टाकावी. थंड झाल्यानंतर भांड्यात ओतून फ्रीजरमध्ये ठेवावे. लवकरच आईस्क्रीम तयार होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेस्टी हेल्दी ‘गुलाबजाम’

$
0
0

जळगाव टाइम्स टीम

गुलाबजाम हा प्रत्येक लग्नातला ठरलेला मिष्ठान्न असून अनेकांचा फेवरेट असतो. जळगाव श‌हरातील काही ठिकाणी ऑसम टेस्ट देणारा गुलाबजाम मिळतो. शहराच्या आसपासच्या खेड्या गावांमध्ये दुधाचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे शहरात अनेक प्रकारचे मिष्ठान्न आणि दुग्धजन्य पदार्थ मिळतात.

गुलाबजाम म्हटलं की, सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. असा तोंडाला पाणी सोडणारा गुलाबजाम विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्ध्रतीने बनविला जातो. यासाठी प्रत्येक ठिकाणची टेस्ट ही वेगळी ठरते.

सरस्वती डेअरी

जुनी सरस्वती डेअरीचा सॉफ्ट आणि स्पंजी गुलाबजाम खाल्याशिवाय एकही जळगावकर राहिला नसेल. कारण हा गुलाबजाम अतिशय सॉफ्ट आणि स्पंजी आहे. याचे कारण म्हणजे गायीच्या दुधाच्या खव्यापासून हे गुलाबजाम तयार केले जातात. त्यामुळे ते अधिक सॉफ्ट बनतात. ३६० रुपये किलोचा भाव असला तरी संध्याकाळपर्यत येथील गुलाबजाम संपून जातात.

दत्त डेअरीचा गुलाबजाम

कांताई हॉल जवळ असलेल्या दत्त डेअरीतील दुग्धजन्य पदार्थांपेक्षा गुलाबजामसाठी जास्त प्रसिद्ध आहे. येथे येणारा प्रत्येक ग्राहक गुलाबजाम घेतोच. म्हशीच्या दुधाच्या खव्याचे बनविलेले हे गुलाबजाम शुद्ध तुपात तळले जातात. त्यानंतर या गुलाबजामला गोड साखरेच्या पाकात टाकले जातात. त्यानंतर गुलाबजाम तयार होतात. २६० रुपये किलो प्रमाणे विकले जाणारे हे गुलाबजाम कमी किमतीत टेस्टी आणि हेल्दी ठरतात.

गुजरातचा काला जामून

गुलामजामच्या तोडीस तोड देणारा गुजरात स्विट्सचा काला जामून बिना पाकचा असतो. गुलाबजाम तयार झाल्यानंतर काही वेळ साखरेच्या पाकात बुडवून ठेवले जातात. त्यांनतर पाकातून काढले जातात. साखरेच्या पाकात बुडवून ठेवल्याने साखरेचा गोडवा आतपर्यत जातो आणि गुलाबजामला टेस्ट येते. २८० रुपये किलो प्रमाणे हा कालाजाम विकला जातो. ग्राहकांनाही हा काला जामून आवडतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैरी करवंदाचं लोणचं

$
0
0

राजश्री नवलाखे, शिवडी

साहित्य: पाव किलो कच्ची करवंद, २ मध्यम आकाराच्या कै‍ऱ्या, ३ चमचे जिरे, ४ चमचे धणे, ८-१० लवंगा, १०-१२ काळी मिरी, २ चमचे मेथी दाणे, १ चमचा सुंठ पावडर, ५-६ चमचे मोहरी डाळ, दीड वाटी गूळ, २ चमचे हळद, २-३ चमचे तिखट, हिंग, ३ चमचे किंवा चवीपुरता मीठ, २ पळी किंवा आवश्यकतेनुसार तेल.

कृती: करवंद पाण्याने धुवुन कोरडी करावीत. कै‍ऱ्याही नीट धुवुन त्यांच्या मध्यम आकाराच्या फोडी कराव्यात. त्याला हळद मीठ लावून ठेवावे. नंतर जिरे, धणे, लवंग, काळी मिरी, मेथी दाणे कढईत थोडे गरम करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. आता कढईत थोडं तेल घेऊन हा बारीक केलेला मसाला, सुंठ पावडर, मोहरी डाळ, हिंग, हळद, तिखट थोडी अख्खी काळी मिरी, लवंग असं सगळं कढईत चांगले परतून घ्यावं. थोडं गार झाल्यावर गूळ आणि मीठ घालून एकत्र करावं. आता या मसाल्यात करवंद आणि कैरीच्या फोडी घालाव्यात. एका पातेल्यात तेल गरम करावं. तेल गार झाल्यावर लोणच्यात घालून बरणीत भरून ठेवावं. तेल करवंद आणि कैरीच्या फोडींच्या वर राहील असं घालावं. २-३ दिवसात हे लोणचं मुरतं. कैरी नको असल्यास फक्त करवंदाचं लोणच घालू शकतात.

कांदाकैरी

साहित्य: १ मध्यम आकाराची कैरी, २ कांदे, २ चमचे दाण्याचं कुट, हळद, तिखट, हिंग, चवीनुसार मीठ

कृती: आधी कैरीचं साल काढून कैरी किसून घ्या. कांदा सोलून किसुन घ्या. कढईत तेल घालून मोहरी, जिरे, हिंगाची फोडणी करून घ्या. त्यात हळद, तिखट टाकून परतून घ्या. आता त्यात किसलेला कांदा, कैरी घालून परता. मग दाण्याचं कूट, मीठ घालून थोडी वाफ आणावी. कैरी आंबट असल्यास कांदा थोडा जास्त घ्यावा.

आंब्याच्या कोयींची भाजी

साहित्य: १२-१४ वाळवलेल्या आंब्याच्या कोयी, २-३ चमचे चिंचेचा कोळ, तेल, हळद, तिखट, १ चमचा मेथी दाणे, हिंग, गुळ, चवीपुरतं मीठ

कृती: आंब्याच्या कोयी फोडून आतील बी काढून घ्यावी. या बीचे दोन भाग करून रात्रभर पाण्यात ठेवावं. त्याचं काळसर पाणी निघतं. ते पाणी काढून दुसरं घालावं. असं ५-६ वेळा करावं. नंतर मीठ घालून कुकरमध्ये शिजवून घ्यावं. त्या शिजलेल्या बियांचे सुरीने बारीक तुकडे करावे. आता पातेल्यात तेल घालून मोहरी, जिरे, मेथी, हिंग, हळद, तिखट घालून फोडणी करावी. त्यात या शिजलेल्या ब‌यिांचे तुकडे घालून परतावं. आता थोडं चिंचेचं पाणी, चवीपुरता गुळ आणि मीठ घालून पुन्हा परतावं. ही भाजी पोळी, पराठे, दशमीबरोबर छान लागते. फ्रीजमध्ये बरेच दिवस चांगली राहते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेस्टी यम्मी जळगावचा पराठा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जळगाव

जळगाव शहरात फास्ट फूडची अनेक प्रसिध्द स्टॉल्स आहेत. मात्र कॉलेज कॅम्पस समोरील प्रत्येक दुकानात युवकांची खाण्यासाठी गर्दी ठरलेलीच. पराठा हा पदार्थ प्रत्येकाच्या घरी बनतो. तरीही जळगाव शहरातील पराठ्यांच्या दुकानांवर खवय्यांची मोठी असल्याचे चित्र पहावयास मिळते.

पराठा हा असा टेस्टी व बनविण्यास सोपा पदार्थ आहे, जो दिवसाच्या प्रारंभी ब्रेकफास्टपासून खाण्यात येता. सकाळी चहा पराठा हा तर अनेकांचा फेवरेट नास्ता समजला जातो. तर रात्रीच्या जेवणात पालक किंवा मेथिचे पराठ्यांसोबत झणझणीत चटनीचा बेत देखील अनेकांचा असतो. जळगाव शहरात पराठे वेगवेगळ्या ठिकाणी मिळतात. प्रत्येक ठिकाणी या पराठ्यांची चव वेगळी आहे. या चवीला जळगावकरांचाही चांगला प्रतिसाद लाभत आहे.

देशाची राजधानी दिल्लीत एका ठिकाणी पराठे वाल्यांची गल्ली प्रसिद्ध आहे. यावरून पराठे खाणाऱ्यांची संख्या आपल्या देशात कमी नाही, हे लक्षात येते. त्याचप्रमाणे पराठा हा सगळ्यांचा ऑल टाईम फेवरेट पदार्थ समजला जातो. पराठा हा पदार्थ कितीही खाल्ला तरी कमीच वाटतो. म्हणूनच जळगावातही पराठ्यांसाठी खास गर्दी केली जाते.

सवी पराठा हाऊस

नुतन मराठा महाविद्यालयासमोरील सवी पराठा हाऊसमध्ये पालक, मेथी, पनिर, आलू, ‌बिट, भोपळा असे विविध फ्लेवरचे पराठे मिळतात. हे पराठे चवीला ऑसम आहेत. या पराठ्यांसोबत कांदा, टोमॅटो, शेंगदाणा आणि लसूणची चटनी सर्व्ह केली जाते. ७० रुपये प्रमाणे मिळणारा सवी स्टॉलवरील पराठा चवीचा खजीना मानला जातो. या ठिकाणी म‌हाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा कायम घोळका पहावयास मिळतो.

सागर पार्कचा लच्छा पराठा

सागर पार्क हा परिसर खवय्यांसाठी जन्नत मानला जातो. या ठिकाणी पराठ्यापासून पानीपूरीपर्यंत सर्व खाद्य पदार्थ मिळतात. सागर पार्कचा लच्छा पराठा कुरकुरीत भाजल्यामुळे वेगळीच चव देतो. गरमागरम आणि कुरकुरीत पराठा सर्वांच्या पसंतीस पडतो. हा पराठा आलू, चिझ, पनिर अश्या वेगवेगळ्या स्वादांमध्ये मिळतो. या पराठ्यांसोबत पुदीन्याची चटकेदार चटनी सर्व्ह केली जाते. ६० रुपयाला एक या प्रमाणे मिळणारा हा लच्छा पराठा खाण्यासाठी अनेकांची सागर पार्कवर गर्दी होत असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंब्याची उपकरी

$
0
0

शीला शेणाई, वसई

साहित्यः चार ते पाच पिकलेले रायवळ आंबे, एक चमचा मैदा किंवा तांदुळाचं पीठ, दोन ओल्या मिरच्या, दोन सुक्या मिरच्या, एक चमचा मोहरी, चार ते पाच कढीलिंबाची पानं, लिंबाएवढा गूळ किंवा दोन मोठे चमचे साखर, मीठ, हिंग, फोडणीसाठी तेल, पाणी

कृतीः प्रथम आंब्याची सालं आणि बाठी काढून वेगवेगळ्या पातेल्यात घ्यावी. सालं पाणी घालून चांगली पिळून काढावी. साधारणतः एक ते दीड ग्लास पाण्याचा वापर करावा. ते पाणी सोललेल्या बाठींमध्ये घालावं. त्यात दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरुन घालाव्या. लिंबाएवढा गूळ किंवा आवश्यक तेवढी साखर आणि चवीवीपुरतं मीठ घालावं. आता हे मिश्रण एकजीव करून गॅसवर शिजवावं. मिश्रण पारदर्शक दिसू लागलं की, बाठी शिजल्याचं समजावं. गॅस बारीक करावा. मैदा किंवा तांदळाच्या पिठात पाणी घालून ते गॅसवरच्या मिश्रणात घालावं. मग दोन चमचे तेल, मोहरी, सुकी मिरची, कढीपत्ता, हिंग यांची फोडणी करुन ती या मिश्रणावर घालावी. अशी होईल तयार, आंब्याची उपकरी.

कैरीचं सुकं लोणचं

साहित्यः कैरीचे ५-६बारीक तुकडे, ७ते८ ब्याडगी मिरच्या, २ चमचे धने, ५-६ मेथी दाणे, ५-६ मिरी, १ चमचा हिंग, १ चमचा हळद, खडे मीठ, एक लहान चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा तांदुळ

कृतीः प्रथम एका कढईत थोडंसं तेल घ्यावं. त्यात सुक्या मिरच्या, धने, मेथी दाणे, मिरे घालून चांगलं भाजावं. मग त्यात हिंग, हळद आणि खडे मीठ घालावं. मीठ तडकेपर्यंत पुन्हा भाजून घ्यावं. आता त्यात मोहरी आणि तांदूळ परतून घ्यावे. भाजलेलं मिश्रण थोडं थंड झाल्यावर मिक्सरमधून त्याची पावडर करुन घ्यावी. चिरलेल्या कै‍रीच्या तुकड्यांमध्ये ही पावडर चांगली मिक्स करावी. या लोणच्याला तेलाची फोडणी नसल्याने कोणीही ते खाऊ शकते. फ्रीजमध्ये ठेवल्यास कितीही दिवस चांगलं राहतं. लोणचं करण्यासाठी झाडावरुन पडलेल्या कै‍ऱ्यासुद्धा चालतात.

अडगई

(कच्च्या फणसाचं लोणचं)

साहित्यः ७ ते ८ कच्च्या फणसाच्या फोडी, एका मध्यम कैरीच्या फोडी, दोन चमचे धने, ७ते८ ब्याडगी मिरच्या, ५-६ मेथी दाणे, ७-८ मिरी, एक चमचा हिंग, एक चमचा हळद, चवीनुसार खडे मीठ, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा तांदुळ, एक चमचा तेल, २ ग्लास पाणी.

कृतीः फणसाचे आणि कैरीचे तुकडे एकत्र करुन ते साधारणतः दोन ग्लास पाण्यात शिजवायला ठेवावे. ते चांगलं शिजल्यावर थंड करायला ठेवावं. त्यातील जास्तीचं पाणी काढून टाकावं. कढईत एक छोटा चमचा तेल घालून, मिरच्या, धने, मेथी, मिरी भाजायला घ्यावं. ते चांगलं भाजून झाल्यावर त्यात हिंग, हळद, मोहरी, तांदुळ घालून भाजून घ्यावं. नंतर खडा मीठ घालून तडतडेपर्यंत परतावं. या मसाल्याची बारीक पावडर करुन घ्यावी. ही पावडर थंड झालेल्या फणस, कैरीत घालावी. लोणच्याला हवा तेवढा खार किंवा खोळ करावा. खोळ कमी वाटल्यास बाजूला ठेवलेलं पाणी घालून त्याचा खोळ वाढवावा. तयार झालेली 'अडगई' फ्रीजमध्ये ब‍ऱ्यापैकी टिकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मँगो स्मूदी...

$
0
0

>>अपर्णा पाटील

नुसता आंबा किंवा आमरस यापेक्षा आंब्याची काही वेगळी रेसिपी करून पाहायची असेल, तर झटपट बनणारी स्मूदी बनवून पाहायला हरकत नाही. थंडगार स्मूदी ही फ्रेश करणारी आहेच. पण, दिवसाच्या कोणत्याही प्रहरात वेगवेगळ्या चवीने आंबा खाण्याची लज्जत देणारीही आहे.

उन्हाच्या चढत्या पाऱ्यावर उतारा म्हणून लस्सी, ताक, लिंबाचा आणि उसाचा रस पिण्याचा मोह अनेकांना होतो. त्याहीपेक्षा मिल्कशेक, कोल्ड कॉफी ही ट्रेण्डी पेयं उन्हाच्या काहिलीनंतर जीव थंड करतात. पण, अशी थंडपेयं आरोग्याला फारशी फायद्याची नसतातच. अशावेळी स्मूदी हा पर्याय मस्तच असतो. फळांचा रस काढला की त्याचा ज्यूस होतो, त्यात दूध घातलं की मिल्कशेक, तर त्याच मिल्कशेकमध्ये आणखी एका फळाचा रस मिसळला की तयार होते स्मूदी.

स्मूदी हे दूध घातलेले मॉकटेल आहे, असं म्हणायला हरकत नाही. यात फायद्याची गोष्ट अशी की, यात ताजी फळं आणि दूध असल्याने स्मूदी आरोग्यालाही चांगली. साखरेऐवजी मध घातलं की, आणखीच फायद्याचं ठरतं. काही स्मूदीजमध्ये दुधाऐवजी योगर्ट वापरलं जातं. फळाच्या स्वादाचे योगर्ट त्यात घातले जातात. सोया मिल्कमध्ये स्मूदी बनवता येतात. त्यामुळं आपल्या आरोग्याविषयी अधिक जागरूक असलेल्यांसाठी स्मूदी चांगली. खरं तर जगात जेवढी फळं तेवढ्या स्वादांच्या स्मूदी बनवनं शक्य आहे. शिवाय दोन फळ एकत्र करून तयार केलेल्या स्मूदींचा स्वाद आणखी वेगळा. त्यात चॉकलेट, कॉफी अशा स्वादाच्या स्मूदी बनवता येतात. त्यामुळे जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीप्रमाणे जितकी फळं तितक्या स्मूदी, असं म्हणता येईल. ​सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आंबे खाण्यासाठी बहाणा हवा असेल, तर मँगो स्मूदीसारखी नवीन रेसिपी नाही. दिवसभरात वेगवेगळ्या चवीनं आंबा खायला मिळाला, तर कोणाला आवडणार नाही.

नुसत्या आंब्याची स्मूदी बनवता येतेच शिवाय स्ट्रॉबेरी, पीच, संत्र, केळी, पॅशनफ्रूट यासारखी विविध फळं एकत्र करून स्मूदी तयार करता येतात. अशा असंख्य स्मूदी घरच्या घरी करायच्या असतील, तर फक्त दोन गोष्टी लागतात, फळं आणि दूध किंवा आइस्क्रीम. अगदी साधी सोपी मँगो स्मूदी बनवण्यासाठी आंब्याचा रस काढून घ्या. त्यात एक केळं, चवीनुसार साखर आणि दूध घालून मिक्सरमधून काढा किंवा ब्लेडरमधून फिरवा की दोन मिनिटांत फ्रेश अँड ज्युसी मँगो स्मूदी तयार होते. सर्व्ह करताना शक्यतो उंच ग्लासमध्ये करा. शिवाय आइस्क्रीम किंवा व्हीप्ड क्रीम घालून सर्व्ह करा. नाही घातलं तरी काही फारसं बिघडणार नाही.

काही स्मूदीमध्ये योगर्ट वापरलं जातं. आपल्याकडे वेगवेगळ्या फ्लेवरचे योगर्ट मिळतात किंवा अगदी फळांच्या स्वादाचे चीज स्प्रेड वापरून स्मूदी बनवता येतात. आंब्याबरोबर आणखी फळ घालण्याबरोबरच मँगो बॅसिल, पिना कोलाडा अगदी पालकासारख्या भाजीचा वापर करून स्मूदी तयार करता येतात. त्यामुळे दिवसभरात कितीही वेळा आंबा खाण्याचा आनंद लुटता येतो. फक्त पाच मिनिटांत बनवता येणारी ही झटपट रेसिपी आहे. शिवाय मुलांपासून ते आजीआजोबांपर्यंत सगळ्यांना त्याचा स्वाद आवडतो. त्यात वेग‍वेगळे प्रयोग करून पाहता येतात.

अगदी सोप्या मँगो स्मूदीसाठी दूध, योगर्ट, मध आणि आंब्याचा गर बर्फासह मिक्सरमधून फिरवा. ही स्मूदी वेगवेगळ्या फळांच्या कॉम्बोने तयार करता येते. आंब्याबरोबर काजू किंवा बदामाचा वापर करून त्या स्वादाची स्मूदी तयार करते. अगदी आलं, दालचिनीच्या स्वादाचा वापर करूनही आंब्याची स्मूदी बनवणं शक्य आहे.

परदेशात सकाळी नाश्त्याला स्मूदी बनवल्या जातात. तर आपल्याकडे रेस्तराँमध्ये जाऊन स्मूदी चाखण्याचा ट्रेण्ड वाढला आहे. पण, घरच्या घरी स्मूदी बनवणं सोप्पंही आहे. अशाच काही सोप्या रेसिपीज...

आंबा-पपई स्मूदी - एका आंब्याचा पल्प, पपई दोन कप (दोन्ही फ्रीजमध्ये ठेऊन थंडगार करून घ्या), त्यात अर्धा कप पाणी घालून मिक्सरमधून फिरवलं की झाली आंबा-पपई स्मूदी तयार. पाण्याऐवजी दूधही चालू शकेल. साखर किंवा मध गरज असल्यास मिक्स करा.

आंबा स्ट्रॉबेरी स्मूदी - एक आंबा, थोड्या स्ट्रॉबेरी, एक कप दूध किंवा पाणी आणि थोडा बर्फ मिक्समधून फिरवून घ्या.

आरोग्यदायी स्मूदी - एक आंबा, अर्धा लीटर स्कीम्ड मिल्क, अर्धा कप योगर्ट (लो-कॅलरी असेल तर जास्त चांगले), एक चमचा बदामाची भिजवून तयार केलेली पेस्ट, एक टेबलस्पून मध थोडं बर्फ घालून बेल्डर किंवा मिक्सरमध्ये घुसळून घ्या. नाश्तात नुसत्या दुधाऐवजी ही स्मूदी घेणं उन्हाळ्यात नक्कीच आरोग्यदायी ठरेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेस्ट में बेस्ट

$
0
0

सुजाता नातू, पनवेल

कैरी राईस

साहित्य : २ वाट्या जुना तांदूळ, कैरी, पाव वाटी तूप, मोहरी, हिंग, हळद, १ चमचा उडीद डाळ, डाळं पाव वाटी, काजू पाव वाटी, शेंगदाणे पाव वाटी, नारळाचा किस अर्धी वाटी, कढीपत्ता, मिरच्या, मीठ, साखर

कृती : तांदूळ धुवून अर्धा तास ठेवा. नंतर त्यात दुप्पट पाणी, मीठ आणि तूप घालून भात शिजवून घ्या. आता परातीत तो मोकळा उपसून घ्या. वर दिलेल्या साहित्याची फोडणी करून घ्या. त्या फोडणीत काजू, डाळ, शेंगदाणे, उड‌ीद डाळ, मिरच्या, कढीपत्ता आणि किसलेली कैरी घाला. ही फोडणी भातावर घालून भात एकजीव करा. नंतर पातेल्यात घालून त्या भाताला एक वाफ द्या.

मँगो डिलाईट

साहित्य : ३ आंब्यांचा रस, ३ वाट्या रवा, ३ कप दुध, पाऊण वाटी गूळ, २ चमचे साखर, १ वाटी ओलं खोबरं, वेलची, जायफळ किंवा केशर आवडीनुसार, मीठ चवीनुसार, खाण्याचा सोडा, सुकामेवा

कृती : आंब्याचा रस, रवा, दुध, गूळ, साखर, खोबरं एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्या. नंतर ४ ते ५ तास हे मिश्रण आंबत ठेवा. नंतर त्यात खाण्याचा सोडा आणि सुकामेवा घाला. हे मिश्रण आप्पे पात्रात थोड्याशा तुपावर घाला. दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या.

पिकलेल्या फणसाची भाजी

साहित्य : फणसाचे गरे अर्धा किलो, मिरच्या, कढीपत्ता, काजू, डाळं, मोहरी, जिरे, हिंग, उडदाची डाळ, मीठ, चिमुटभर साखर, ओलं खोबरं, तेल

कृती : गऱ्यांचे उभे पातळ काप करून घ्या. कढईत ३ चमचे तेल घालून त्यात १ चमचा मोहरी, थोडं जिरं, चिमुटभर हिंग घालून फोडणी करा. त्यावर पाव वाटी काजू, डाळं, १ चमचा उडदाची डाळ घालून परता. त्यात कढीपत्ता, लाल-हिरव्या मिरच्या घालून परता. चवीनुसार मीठ साखर घालून त्यात गऱ्यांचे काप घाला. वरून ओलं खोबरं घालून भाजीला एक वाफ आणा.

काजू रोल्स

साहित्य : दीड भांडं काजूंची पावडर, १ वाटी दुध पावडर, दीड वाटी पिठी साखर, वेलची केशर, पाणी

कृती : प‌ठिी साखर आणि दुधाची पावडर एकजीव करा. एका पातेल्यात पाणी उकळत ठेऊन त्यावर दुसरं भांडं ठेऊन त्यात हे मिश्रण ओतून मिक्स करून घ्या. पाच मिनिटांनी ते खाली उतरवून त्यात काजू पावडर आणि वेलची पावडर घाला. पीठ पाणी घालून मळून घ्या. गोळा तयार झाल्यावर त्याचे छोटे गोळे करून रोल्स करून घ्या. वरून चांदीचा वर्ख लावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सीताफळ रबडी

$
0
0


सीताफळ रबडी

साहित्य - एक लिटर दूध, चार वाट्या साखर, दोन वाट्या सीताफळाचा गर, चिमूटभर केशर, आवडत असल्यास चिरलेले ड्रायफ्रूट्स.

कृती - जाड बुडाच्या भांड्यामध्ये दूध आटवत ठेवावं. अंदाजे निम्मे झालं, की त्यात साखर घालावी. साखर विरघळली, की केशर घालावं. गॅस बंद करून गार होऊ द्यावं. त्यात सीताफळाचा गर मिसळून अलगद ढवळावं. फ्रिजरमध्ये ठेवून थंडगार झाल्यावर सर्व्ह करावं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खवय्येगिरीत रमते मी

$
0
0


श्रेया बुगडे-शेठ, अभिनेत्री

मी मुंबईला राहत असले, तरी माझा जन्म पुण्याचा. म्हणूनच की काय पक्की चोखंदळ आहे मी खाण्या-पिण्याबाबतीत. गंमत म्हणजे, माझं सासरही पुण्यातच. सोनेपे सुहागा म्हणतात ना तस्सं. आजही आठवून गंमत वाटते मला, की आई कधीही टिपिकल आयांसारखी माझ्या मागे नाही लागली. मला स्वयंपाकघराची अॅलर्जी वगैरे नव्हती; पण मला स्वयंपाक करण्यात आनंद वाटायचा नाही. किंबहुना आजही मला त्यात आनंद वाटत नाही.

पोळी-भाजी-आमटी-भात रांधण्यात गुंतण्यापेक्षा केव्हातरी जाऊन वेगवेगळे हलके पदार्थ करायला आवडतात मला, माझी आई अलिबागची. तिच्या हाताला अफलातून चव आहे. तिच्याकडून मी माशांची आमटी, फिश फ्राय, सुकं मटण, सोलकढी असे खास पदार्थ शिकून घेतलेत. मला शाकाहारी फारसं आवडत नाही. आईइतक्याच सासूबाईही माझे प्रचंड लाड करतात. पुण्याला धावपळीत आले, तरी 'गुडलक'ला जातेच जाते. तिथं बनमस्का, खिमापाव आवर्जून खाते. 'वैशाली'तली एसपीडीपी तर माझी ऑलटाइम ‌फेव्हरेट आहे. तिथला चीझ चिली टोस्ट नक्की चाखावा असाच. कॅम्पातल्या 'मारझोरिन'मधली कोल्ड कॉफी, चिकन सँडविच, मावा केक एकदम वरचा क्लास.

मुंबईतील टाउन साइडचं 'बडेमियाँ' अगदी मध्यरात्रीच्याही पुढं सुरू असतं. गरमागरम वाफाळते कबाब खावेत तर तिथंच. तो माहोलच काही और असतो. कुलाब्याचा 'मॉडिगर कॅफे' तर अगदी ब्रेकफास्टपासून ते थेट डिनरपर्यंत ठाण मांडून बसावा असा. युरोपियन स्टाइलचं फूड जॉइट आहे हे. तिथं खाल्ल्यानंतर समुद्रावर मस्त भटकंती करायची. हा अनुभव प्रत्येकानं अनुभवावा असाच!

शब्दांकन - निनाद पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाळासाहेबांची मिसळ

$
0
0


सौरव बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

मिसळ म्हणजे नाशिककरांचा विक पॉईंट. नाशिकच्या मिसळला जसा इतिहास आहे, तसाच या मिसळीच्या काही खास ठिकाणांनादेखील आहे. जुन्या नाशकातील खवय्यांचे मिसळीचे चोचले पुरवण्याचं काम गेल्या चाळीस वर्षांपासून करतेय ती म्हणजे बाळासाहेबांची मिसळ.

बाळासाहेब शेळके यांनी सन १९७५ साली रविवार कारंजावर एक लहानश्या गाडीवर ही मिसळ सुरू केली. मिसळीला ठाम असं नावही नव्हतं. पण खवय्ये मात्र बाळासाहेबांची मिसळ खायला जातोय असं मोठ्या तोऱ्यात सांगायचे आणि अजूनही सांगतात.

बाळासाहेबांची मिसळ बघता बघता इतकी लोकप्रिय झाली की नाशिकमधील अनेक भागातून खवय्ये खास बाळासाहेबांची मिसळ खाण्यासाठी 'आरके'वर येऊ लागले. याच लोकप्रियतेच्या जोरावर बाळासाहेबांचे पुत्र सचिन शेळके यांनी गेल्या दोन महीन्यांपासून गाडीचे एका हॉटेलमध्ये रूपांतर केले आहे. वडिलांच्या नावाने ओळखली जाणारी मिसळ त्याच नावाने कायम ठेवत हॉटेललाही 'बाळासाहेब' हेच नाव ‌त्यांनी दिले आहे.

मिसळ शौकीनांना नेहमी मिसळमध्ये नाविन्य हवे असते. इथली खासियत म्हणजे इथे दिली जाणारी शेव शेवटपर्यंत मिसळच्या रश्श्यात विरघळत नाही. या अनोखेपणामुळेच बाळासाहेबांच्या मिसळला खवय्ये गर्दी करतात. बाळासाहेबांची मिसळ फेमस आहेच, पण त्याचसोबत शेव इथला शेवरस्साही फेमस आहे. मिसळ, शेवरस्सा आणि कांदेपोहे हे मोजकेच पण अफलातून चवीचे पदार्थ हॉटेल 'बाळासाहेब'मध्ये मिळतात.

मिसळ

बाळासाहेब नावाने प्रसिध्द असलेली ही मिसळ बनवताना यामध्ये घरगुती मसाल्यांचा वापर केला जातो. मिसळचे मठ आणि रस्सा तयार करतांना त्यात आल्या-लसणाची पेस्ट, जीरे, मोहरी, कढीपत्ता घालून मिसळ तयार केली जाते. मिसळसोबत दिली जाणारी जाड व बारीक शेव तयार करतांना पीठ मळण्यापासून शेव तळण्यापर्यंत सर्व शास्त्रशुध्द पध्दतीपे तयार होते. यामुळे शेव रश्श्यामध्ये शेवटपर्यंत विरघळत नाही. त्यानंतर मिसळ सर्व्ह करताना कांदे पोहे, त्यावर मठ, त्यावरती कांदा व शेव घालून गरमागरम रस्स्यासोबत मिसळ सर्व्ह होते. मिसळ खाताना शेवटच्या घासापर्यंत शेवचा कुरकुरीतपणा जाणवत असतो. खवय्यांना हवी तशी तिखट, कमी तिखट मिसळ सर्व्ह होते. मिसळसोबत दही आणि पांढरा गोड कांदाही सर्व्ह केला जातो.

शेवरस्सा

शेव रस्स्यामध्ये पोहे तसेच जाड आणि बारिक शेव पसरली जाते. त्यावर रस्सा ओतला जातो. अशा प्रकारे शेव रस्सा तयार केला जातो. ज्या खवय्यांना इथली शेव जास्त पसंत आहेत ते शेव रस्स्याला अधिक पसंती देतात. शेवटपर्यंत शेव कुरकुरीत राहील्याने शेवरस्स्याची चव कायम राहते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चुलीवरची मिसळ

$
0
0

अश्विनी पाटील, नाशिक

तमाम खवय्यांची आवड लक्षात घेत नाशिक परिसरात खाण्याचे कितीतरी अड्डे निर्माण झाले. मात्र सर्वांत जास्त लक्ष वेधणारे पदार्थ ठरले ते 'चुलीवरची मिसळ' आणि 'चुलीवरचं जेवण'. सध्या नाशिकमध्ये जिथं तिथं चूल अशी परिस्थिती निर्माण झाली असून नाशिककरांमध्ये चूलवरच्या पदार्थांची क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरापासून दूर असणाऱ्या या चूल स्पेशल ठिकाणांना पसंती मिळत आहे.

नाशिककरांचं मिसळ प्रेम काही नवीन नाही त्यातच नाशिकच्या मिसळची चव सर्व स्तरांतील व्यक्तीच्या जीभेवर रेंगाळते. अनेक कलाकारही आवर्जून नाशिकला आल्यावर मिसळची चव चाखल्याशिवाय जात नाही. पण गेल्या वर्षभरात या मिसळमध्ये एक नवीन ट्रेंड रुजला तो म्हणजे 'चुलीवरची मिसळ'. शहराच्या प्रत्येक उपनगरात एकतरी चुलीवरची मिसळ सापडतेच.

अवघ्या काही काही दिवसात या चुलीवरच्या मिसळीने सर्वांची मनं जिंकली. बहुतांश नाशिकरांचा वीकेंड ब्रेकफास्ट म्हणजे ही चुलीवरची मिसळ ठरलेला असते. मात्र आता फक्त चुलीवरची मिसळच नाही. चुलीवरच्या जेवणाचाही ट्रेंड रुजत चालला आहे. चुलीवरच्या जेवणाचे त्यातल्या त्यात नॉनव्हेज प्रेमींसाठीचे कितीतरी पर्याय नाशिकमध्ये निर्माण झाले आहे. दर आठवड्याला नवीन ठिकाणाची चर्चा नाशिककर खवय्यांमध्ये ऐकायला मिळते. रोज एखाद्या ग्रुपचा चुलीवरच्या जेवणाचा बेत ठरताना दिसतो. या चुलीवरच्या जेवणाच्या चवीने सर्वांच्याच जीभेवर ताबा मिळवल्याची परिस्थिती सध्या आहे.

चवीची भुरळ

शहरी भागात चुलीवरच्या जेवणाचा अनुभव विरळच असतो. बरेच लोक गावी किंवा फिरण्याच्या निमित्ताने हा आनंद लुटतात. चुलीवरच्या जेवणाची चव नेहमीच्या चवीपेक्षा काही औरच असते. त्यामुळेच चुलीवरची मिसळ हीट ठरली आहे. फक्त नाशिकच नाही तर बाहेरून येणाऱ्या व्यक्तींनाही याची भुरळ पडली आहे.

गावाकडचा फील

फक्त चुलीवर तयार केलेली मिसळ किंवा जेवण नाही तर त्या ठिकाणाला गावाचा फील देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. गावाकडची घरं, तेथील जीवनपद्धती, जेवणाची पद्धत, संस्कृती या सगळ्यांचा फील येथे दिला जातो. त्यामुळेच एक छोटीशी ट्रिप केल्याचा आनंदही लोकांना मिळतो. नाशिकमधील बरीच ठिकाणे शहरापासून दूर अंतरावर किंवा निसर्गाच्या सान्निध्यात आहेत.

चुलीवरचं जेवण

बऱ्याचदा चुलीवरचा मटणाचा बेत आखला जातो. चुलीवरच्या मटणाची चव आणि त्याला असलेला चुलीचा गंध बरोबर जीभेपर्यंत पोहोचतो. गावराण जेवणाचा बेत प्रत्येकाला हवाहवासा असतो. पुष्कळ लोकांकडे घरात मांसाहारी पदार्थ तयार केले जात नसले तरीही ते लोक बाहेर हे पदार्थ खाण्याचा आनंद घेतात. अशांसाठी चुलीवरचं जेवण म्हणजे पर्वणीच ठरते. बाजरी, ज्वारी किंवा तांदळाची भाकरी आणि त्यासोबत झणझणीत मसाल्याची भाजी अशी अप्रतिम मेजवानी यानिमित्ताने लोकांना मिळत असल्याने चुलीवरच्या जेवणाचाही बेत मोठ्या प्रमाणात आखला जातो. या चुलीवरच्या पदार्थांनी बरोबर नाशिककरांची नस पकडली आहे. त्याचबरोबर पुरणपोळीसारखे पदार्थही याठिकाणी उपलब्ध असतात.

काही प्रसिद्ध ठिकाणे

नाशिकमध्ये गेल्या वर्षभरात चुलीवरची मिसळ मिळणारी नवीन ठिकाणांनी नावे पुढे आली. हॉटेल संस्कृतीने याची सुरुवात केली. या सर्व ठिकाणांनी आपले वेगळेपण जपत ओळख जपली आहे. तसेच काही नवीन नावेही समोर येताना दिसतात.

साधना मिसळ

मामाचा मळा

गोविंद मिसळ

ओवारा

भगवंतराव मिसळ

हॉटेल चूल

हॉटेल रेडचिली

हॉटेल ग्रेपसिटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझ्यासाठी प्रिय शिरा

$
0
0


सुहिता थत्ते, अभिनेत्री

मी फारशी नाही रमले स्वयंपाकघरात. मंडईत जाऊन भाज्या आणणं मी खूप एन्जॉय करायचे, किंबहुना आजही करते.

आमच्या घरामध्ये गव्हाच्या पीठाचा शीरा बनवताहेत हे केवळ सुगंधावरून साऱ्या घरादाराला कळायचं आणि शेजारीपाजारीही. तोंडात चमचा घेताचक्षणी जीभेवर विरघळणारा तो कणकेचा शिरा मला आजसुद्धा प्रिय आहे.

पुण्यातल्या शुक्रवार पेठेतल्या आमच्या घराच्या अगणित आठवणी मी आजसुद्धा अलवारपणे जपून ठेवल्या आहेत. आईच्या हातात कसली जादू होती म्हणून सांगू? अत्यंत वेळकाढू प्रकारात मोडणारी फणसाची भाजी ती सुपर्ब करायची. तेव्हा ओरिजनल चिक दूध मिळायचं, त्याचा गुळाचा खरवस केला, की आम्हा मुलांची चंगळ. टोमॅटोच्या सारामध्ये मक्याची कणस घालण्याची भन्नाट आयडिया आईचीच.

मी फारशी नाही रमले स्वयंपाकघरात. मंडईत जाऊन भाज्या आणणं मी खूप एन्जॉय करायचे, किंबहुना आजही करते. वेगवेगळ्या रंगसंगतीच्या भाज्या घ्यायला मला वेगळीच मौज वाटते. एकदम रिफ्रेश होऊन जाते मी मंडईत.

बांद्र्याला माझ्या घराजवळ 'सदिच्छा' हे माझं फेव्हरेट फूड जॉइंट आहे. कुरकुरीत तळलेले बोंबिल खावेत, तर इथंच. सुक्क मटण, भाकरी, माशाची आमटी सारंकाही लाजवाब. 'एमआयजी क्लब'मधलं बटर चिकन, खिमा पाव आणि व्हाइट ग्रेव्हीचं चिकन एकदा तरी चाखावं अस्सच आहे.

पुण्याला 'वाडेश्वर'चा मेदूवडा, इडली डोसा आणि सांबार थेट साउथची याद करून देणारा. दर्शन मात्रे मन कामना पुरती या कॅटेगरीतला! शूटिंगला सुट्टी असली, की मी नवनवे पदार्थ बनवायला घेते. नवे प्रयोग करायला आवडतं मला. बटाट्याच्या कुरकुरीत काचऱ्या माझ्या हातच्याच लागतात घरच्यांना. मी डब्यात आणलेला साधा दहिभातही आवडीनं खातात सेटवर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गव्हाच्या पीठाचा शीरा

$
0
0


गव्हाच्या पीठाचा शीरा

साहित्य - चार वाट्या गव्हाचं पीठ, चार वाट्या गूळ, वाटीभर साजूक तूप.

कृती - प्रथम एका कढईत मंद आचेवर पीठ खरपस भाजून घ्यावं. पूर्ण सोनेरी रंगावार भाजून झालं, की त्यात साजूक तूप घालावं. पीठाच्या दुप्पट पाणी उकळून पाण्यात गूळ विरघळून घाला. ते पाणी पीठामध्ये घालून अलगद ढवळावं. कढईवर झाकण ठेऊन मंद आचेवर शिरा शिजू द्यावा. आवडत असल्यास वरून आणखी साजूक तूप घालून थोड्या वेळानं गॅस बंद करावा. गरमागरम सर्व्ह करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रायवळ आंब्याची बाठवणी

$
0
0

शिल्पा पुरंदरे, वर्सोवा

साहित्य : सहा रायवळ आंबे, चार हापूस आंब्याचा रस, फणसाच्या गरे, दोन केळी, चार चमचे राईची पावडर, दोन चमचे लाल तिखट, एक वाटी नारळाचं दूध, चवीनुसार मीठ व साखर.

कृती - उकळत्या पाण्यात रायवळ आंबे टाकून वर झाकण देऊन गॅस बंद करावा. भांड्यात हापूस आंब्याचा रस घ्यावा, त्यात राई पावडर, लाल तिखट, मीठ, साखर घालून रस ढवळून, त्यात फणसाचे गरे छोटे तुकडे करून, केळ्याचे काप आणि नारळाचं दूध घालून रस सारखा करावा. रायवळ आंब्याची सालं काढून रसात घालून पुन्हा ढवळून घ्यावं आणि फ्रिजमध्ये गार करत ठेवावं. चपाती अथवा तांदळाच्या भाकरी बरोबर छान लागते.

कैरी आणि भोकरांचं लोणचं

साहित्य : आठ दहा भोकरं, तीन कैऱ्यांचा किस, एक वाटी लोणचं मसाला, चार चमचे राई, थोडा हिंग, राईचं तेल एक वाटी, मीठ, हळद, एक वाटी शेंगदाण्याचं तेल.

कृती - भोकरं स्वच्छ फडक्यांनी पुसून घ्यावी. एकाचे दोन तुकडे करून त्यातला चिक आणि बी काढून प्रत्यक्ष भोकराला हळद-मीठ, चीक जाईपर्यंत चोळावे. कैरीचा किस घट्ट पिळून घ्यावा, त्यात लोणच्याचा मसाला, मीठ, हळद, आणि शेंगदाण्याच्या तेलात, हिंग-राईची फोडणी गार करून ओतावी. हे मिश्रण एकजीव करून प्रत्येक भोकरांत भरावं. काचेच्या बरणीत भरून त्यावर राहिलेला किस टाकावा, त्यावर राईचं गरम करून गार झालेलं तेल टाकावं. झाकण लावून बरणी पाच-सहा दिवस उन्हात ठेवावी. लोणचं तयार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चवीने खाणार, त्याला पाचकळशी वाढणार!

$
0
0



जात नाही, ती 'जात' असं म्हटलं जातं. परंतु, एकवेळ जातीपातीची बंधनं सैल होतील, मात्र खाद्यसंस्कृतीची बंधनं सैल होणार नाहीत. कारण प्रत्येक समाजाला स्वतःची खाद्यसंस्कृती आहे आणि प्रत्येक समाजाला आपल्या खाद्यसंस्कृतीचा प्रचंड अभिमानही. वेगवेगळ्या समाजात रुजलेल्या या वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचाच वेध आजपासून दर पंधरवड्याला या सदरात घेणार आहोत, त्यांच्या काही खास पाककृतींसह. आज आस्वाद घेऊ या सोमवंशीय क्षत्रिय पाठारे ऊर्फ पाचकळशी समाजाच्या खाद्यसंस्कृतीचा...

मुकुंद कुळे

'खाणारा दमदार असेल, तर त्याला वाढणाराही दिलदार असतो', असं गमतीने म्हणण्याची पद्धत आहे. कारण चवीचवीनं जेवणारा कुणी असेल, तर वाढणा‍ऱ्यालाही मजा येते. अर्थात चवीने खाणारा असला, म्हणून रोज कुणी बाहेरच्याला कौतुकाने वाढणार नाही! ती गंमत अपवादातच असते. तरीही वरील उक्तीचा अनुभव घ्यायचा असेल, तर खुशाल पाचकळशी समाजातल्या कुणाचीही ओळख काढावी आणि निमित्ताने त्यांच्याकडे जेवायला जावं. शेवळाचं कालवण, जवळ्याची वडी, कोळंबीची अळुवडी, ओल्या बोंबलाचा पोपट, चवळी-वजरी, खिम्याच्या करंज्या, करंदीचे खारवणी, खिम्याचे मुठे... असं दणकेबाज तिथे काहीतरी हमखास खायला मिळणार. विशेष म्हणजे ताटात जे वाढलं जाणार ते निगुतीनिगुतीने नाही, तर सढळ हाताने. जेणेकरून खाणारा तृप्त झाला पाहिजे, त्याची जेवणावर वासना राहता कामा नये. मात्र, एवढं चवीचवीने जेवून बाहेर पडल्यावरही काहीतरी मागे उरतचं, तो असतो पाचकळशी मसाल्याचा वास! जेवण शाकाहारी असो वा मांसाहारी, त्यात शक्यतो घरी केलेला किंवा खास दळून आणलेला पाचकळशी मसाला हवाच!

हा पाचकळशी समाज म्हणजे, मुंबईच्या आद्य समाजांपैकी एक! जसे वारली, कोळी, आगरी, पाठारे प्रभू, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू, हे मुंबईतले जुने समाज, तसेच त्यांच्याबरोबरीने मुंबईत वाढलेला समाज म्हणजे सोमवंशी क्षत्रिय पाठारे ऊर्फ पाचकळशी. मुंबईतलं याचं वास्तव्य थेट सातशे-आठशे वर्षांपासूनचं. सोमवंशी, म्हणजेच थेट क्षत्रिय चंद्रवंशाशी नातं सांगणारा हा समाज पैठणच्या बिंब राजाबरोबर तेव्हाच्या अपरान्त म्हणजेच, कोकणात आला आणि इथे स्थायिक झाला. डहाणूपासून ते मुंबई-उरण, चौलपर्यंत या समाजाने वस्ती केली. जे पालघर-डहाणू परिसरात स्थिरावले त्यांनी भाज्यांच्या वाड्या करायला सुरुवात केली, म्हणून ते वाडवळ झाले. त्यांनाच चौकळशी असंही म्हटलं जातं. तर मुंबई परिसरात जे स्थिरावले, ते काहीसे जमीनदार झाले. कारण त्यांच्या ताब्यात मुंबईतल्या वरळी, चेंबूर, दादर, माहीम, गोरेगाव, मालाड ते थेट भाईंदरपर्यंतच्या जमिनी आल्या. त्यामुळे त्यांची आडनावंही तशीच पडली- दादरकर, वरळीकर, चेंबूरकर, भाईंदरकर, माहीमकर... याशिवाय म्हात्रे, पाटील, मंत्री, कोतवाल, पुरव, चोगले अशी काही आडनावंही या समाजात आहेत. यांच्याही मालकीच्या मुंबईत मोठ्या जमिनी आहेतच.

आता कालौघात या समाजाच्या जमिनी टिकल्यात की नाहीत ते माहीत नाही. पण, थेट आठशे वर्षांची परंपरा असलेली या समाजाची पाचकळशी (लग्नात एकावर एक पाच कळशा मांडून ठेवायची पद्धत आहे म्हणून पाचकळशी, तर चार कळशा ठेवणारे चौकळशी) खाद्यसंस्कृती मात्र आजतायगायत टिकून आहे आणि ही खाद्यसंस्कृती पक्की मांसाहारी आहे. हा समाज शाकाहारही हौसेने करतो, पण देवाचे वार, उत्सव पाळूनच. अन्यथा रोजसुद्धा प्रेमाने मांसाहार रांधतील. मांसाहाराची ही आवड समुद्राच्या निकटच्या सान्निध्यामुळेच लागलेली. यांची तेव्हाची घरं म्हणजे समुद्रालाच खेटलेली. साहजिकच रोज कोळ्यांनी आणलेली ताजी ताजी मासळी यांच्या घरात यायची. यातूनच यांची वैशिष्ट्यपूर्ण मत्स्याहारी खाद्यसंस्कृती बहरली. भुजणीचा सरंगा, कोलंबीचं मुंब्र, घोळ-वांगं, कालव्याची भजी, करंदीचे कटलेट, गाठ्या कोलंबी... असे कितीतरी पदार्थ पाचकळशी खाद्यसंस्कृतीचे शान वाढवून आहेत. केवळ मांसाहारी किंवा मत्स्याहारीच नाही, तर शाकाहारी पदार्थ करण्यातही यांचा हातखंडा आहे. यांच्या घरातील कोबीचे भानोले, तांदळाची रवळी, नारळाच्या रसातील शेवया, अननसाची आमटी एकदा चाखली की त्यांची चव विसरणं जवळजवळ अशक्य आहे. पूर्वीचं जीवन आजच्या तुलनेत शांततेचं असल्यामुळे आणि महिलावर्ग घरातच थांबत असल्याने या समाजातल्या महिलांनी रोजचं जेवण जेवढं चवीढवीचं होईल, त्याकडे लक्ष पुरवलं. त्यासाठी नारळाचा चव, नारळाचं दूध, याचा वारेमाप वापर जेवणात केला. तर मत्स्याहारी पदार्थाचा हिंवस वास मोडण्यासाठी चिंचेचा कोळ वापरला. परिणामी पाचकळशी कुटुंबात गेलात, तर त्यांच्या घरात नारळ आणि चिंचेला कधी खळ नसतो.

या समाजात काही पदार्थ विशिष्ट प्रसंगी करण्याचीही पद्धत आहे. उदाहरणार्थ दिवाळीला पहिली अंघोळ झाली की आधी तांदळाची रवळी खायला दिली जाते. त्यानंतर तिर फराळ. तसंच दिवाळीचा फराळ करायला घेताना आधी तिळो‍ऱ्या म्हणजे तीळपापड्या आणि चनपापड्या केल्या जातात. बाकीच फराळ त्यानंतरच करायची पद्धत आहे. तसंच यांच्या लग्नातील जेवणात चवळीची भाजी आणि कांदा-बटाट्याचा रस्सा हवाच. तो नसेल, तर ते पाचकळशी लग्नच नव्हे! विशेष म्हणजे पाचकळशी समाजात गौरीला मांसाहारी नैवेद्य दाखवण्याची पूर्वापार पद्धत आहे. या ताटात, भरलेलं पापलेट, खिम्याची कंरजी, करंदीचं पॅटीस, कोलंबीची अळुवडी असे अनेक मांसाहारी पदार्थ ठेवले जातात. पूर्वी यांची मोठमोठी घरं असायची, तेव्हा या मांसाहारी ताटामुळे गणपती आणि गौर वेगवेगळ्या खोलीत बसवले जायचे. कारण गणपतीला मांसाहार चालत नाही. परंतु, आता जागेअभावी गौर-गणपती बाजूबाजूला बसले, तरी नैवेद्याचं ताट दाखवताना मध्ये पडदा धरला जातो.

देवांना शाकाहार-मांसाहाराचा वेगवेगळा नैवेद्य दाखवत असले, तरी पाचकळशी समाजाने स्वतःच्या काद्यसंस्कृतीत मात्र या दोन्हीचा सुरेख मेळ साधलेला आहे.

अननसाची आमटी

साहित्य : १ अननसाच्या फोडी, एक मोठी नारळ चव, ७-८ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी कोथिंबीर, कढीपत्ता, १ इंच आले, १ टीस्पून हळद, २ टीस्पून धणा जिरे पावडर, एका लिंबाएवढी चिंच, २-३ टेबलस्पून चण्याच्या डाळीचे पीठ, हिंग, २-३ टेबलस्पून साखर, १०-१२ काजू.

कृती : पातेल्यात फोडणीसाठी तेल टाकावे. तेल तापल्यावर जिरे, हिंग व कढीपत्ता घालावा. नंतर हळद व धणा जिरे पावडर टाकून परतावे व अननसाच्या फोडी व काजू घालून परतावे व दोन वाट्या पाणी घालून अननस शिजू द्यावा. नारळ चव, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, आले सर्व मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. त्यातच २-३ टेबलस्पून चण्याच्या डाळीचे पीठ टाकून एकदा मिक्सर फिरवून मिक्स करून घ्यावे म्हणजे वेगळे पीठ कालवून घालावे लागत नाही. अननसाच्या फोडी शिजल्यावर त्यात तयार वाटण घालावे. चिंचेचा कोळ चवीनुसार मीठ व साखर घालून सर्व चांगले उकळवून घ्यावे. अननसाची आमटी तयार.

कोबीचे भानोले

साहित्य : ५०० ग्रॅम कोबी बारीक चिरलेला, ५०० ग्रॅम चण्याच्या डाळीचे पीठ, २-३ टेबलस्पून तांदळाचे पीठ, २ टीस्पून पाचकळशी मसाला, १ टीस्पून मिरची पावडर, १/२ टीस्पून हळद, २ टीस्पून धणा-जिरे पावडर, १ टीस्पून गरम मसाला, दोन लिंबांचा रस, २ टेबलस्पून साखर, अर्धी वाटी नारळ, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार, अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा, २-३ टेबलस्पून तेलाचे मोहन, दोन कांदे बारीक चिरलेले, २ टीस्पून आले-लसूण पेस्ट, अर्धा टीस्पून हिंग, तळण्यासाठी तेल.

कृती : पातेल्यात २-३ चमचे तेल घेऊन त्यात सर्व मसाले मिसळावेत. नंतर त्यात कोबी, कांदा व कोथिंबीर घालून हाताने सर्व एकजीव करून घ्यावे व लिंबाचा रस व साखर मीठ घालावे. नंतर चण्याचे पीठ व तांदळाचे पीठ घालून गरजेप्रमाणे पाणी वापरून पीठ इडलीच्या पिठाप्रमाणे कालवावे व १५ मिनिटे झाकून ठेवावे. ज्या भांड्यात भानोले बनवायचे आहे त्याला आतून तेल किंवा तूप लावून घ्यावे व त्यात तयार पीठ ओतून कुकरमध्ये उकडून घ्यावे. थोडे थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडाव्यात व तव्यावर तेल सोडून तळून घ्याव्यात. भानोले गरम व थंड दोनही प्रकारे छान लागते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दळाचे लाडू

$
0
0

मे महिन्याची सुट्टी संपून सोमवारपासून शाळा सुरू होतायत. शाळा सुरू झाली की मम्मींना टेन्शन असतं मुलांना डब्यात खाऊ काय द्यायचा? तो खाऊ मुलांना आवडेल असा चटपटीत हवा आणि पौष्टिकही हवा. म्हणूनच 'मुक्ता'च्या मैत्रिणींसाठी या खास रेसिपीज दिल्यात सुनीता लिमये यांनी.

दळाचे लाडू

साहित्य - एक वाटी रवा, एक वाटी मैदा, किसमिस, दीड वाटी दळलेली साखर, एक वाटी साजूक तूप

कृती - रवा तुपावर खमंग भाजून घ्यावा. त्याच तुपावर मैदा भाजून घ्यावा. नंतर दोन्ही मिश्रण एकत्र करावं. गार झाल्यावर त्यात वेलची पावडर, पिठीसाखर घालून चांगलं मळून घ्यावं. नंतर त्यात बेदाणे, बदाम, काजू घालून लाडू वळून घ्यावेत.

खांडवीच्या वड्या

साहित्य - एक वाटी तांदूळ रवा, दोन वाट्या पाणी, दीड वाटी गूळ, मीठ, वेलची, तूप.

कृती - तांदूळ रवा तुपावर चांगला तांबूस भाजावा. रव्याच्या दुप्पट पाणी घेऊन त्यात गूळ घालावा. चवीपुरतं मीठ घाला. नंतर पाण्याला उकळी आणा. त्यात भाजलेला रवा घाला आणि शिजवा. नंतर वेलची पावडर घाला. घट्ट झाल्यावर ताटाला तुपाचा हात लावून शिजलेला रवा ओता. त्यावर ओलं खोबरं पसरवून थापा व त्याच्या वड्या कापा.

सफरचंदाचे पराठे

साहित्य - एक मोठं सफरचंद, पिठीसाखर आवडीनुसार, १ चमचा काजू-बदाम पावडर, लोणी, अर्धा चमचा वेलची पावडर, गव्हाची कणिक, भाजण्यासाठी तेल, तूप, मीठ, साय, तांदूळ पीठी

कृती - प्रथम सफरचंदाची सालं काढून ते किसून घ्यावं. त्यात वेलची पावडर, काजू पावडर घालावी. नंतर आवडीनुसार पिठीसाखर घालून व्यवस्थित सर्व मिश्रण करून त्यात मावेल एव्हढी कणिक घालून घट्ट भिजवावे. तव्यावर तूप सोडावं. प्लास्टिकच्या कागदावर थापून किंवा तांदळाच्या पिठावर लाटून खमंग भाजावं. लोणी किंवा सायीबरोबर खावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरगुती रेडी टू इट

$
0
0

आदिती कडवेकर, आहारतज्ज्ञ

रेडी टू इट नूडल्सवर बंदी आली असली, तरी नूडल्सप्रेमींना तितकेच चविष्ट घरगुती नूडल्स बनवता येऊ शकतील. त्याच्या काही रेसिपी.

चटकन होणारे, करायला सोपे असले आणि चटपटीत असले, तरी इन्स्टंट नूडल्स शरीरास घातकच आहेत, हे पुन्हा नव्यानं सिद्ध झालं आहे. मला आठवतं, माझ्या लहानपणी असं फास्ट फूड क्वचित खाल्लं जायचं. ते ही गंमत म्हणून; पण आपली लाइफस्टाइल फास्ट फूड आणि रेडी टू इटच्या जवळ गेली आहे तशी ती फास्ट आजारांच्याही जवळ गेली आहे. नूडल्ससारखे प्रकार लहान मुलांचे अतिशय आवडते. मात्र, त्यातले प्रिझर्व्हेटिव्ह्ज, चव आणणारे पदार्थ, छान रंग आणणारे घटक अति प्रमाणात वापरल्यास शरीरास घातक ठरतात. याचे दुष्परिणाम सांगायचे झाले, तर लहान वयात स्थूलपणा, मधुमेह, हृदयविकार, पचनाचे विकार इत्यादी दिसून येतात. एका सर्वेक्षणानुसार जगभरात सर्वाधिक नूडल्स खाणाऱ्यांच्या यादीत भारतात चौथा क्रमांक लागतो.

मग या नूडल्सना घरगुती आणि आरोग्यपूर्ण पर्याय काही आहे का? तर निश्चितच आहे.

गव्हाचे नूडल्स

साहित्यः तीन कप कणीक, मुगाचं किंवा मसुराचं पीठ एक वाटी, पाणी सव्वा वाटी, मीठ चवीनुसार, तेल एक चमचा

कृतीः सर्व पिठं एकत्र करून त्यात तेल व मीठ घाला. पाणी घालून घट्ट मळून घ्या. या पिठाचे गोळे बनवून शेवेच्या पात्रात भरून घ्या. भांड्यात पाणी उकळत ठेवा. त्यावर तेलाचा हात लावलेली चाळणी ठेवा. या चाळणीत

शेवेच्या साच्याने शेवया पाडा. (एका वेळेस जास्त थर करू नका) १० ते १५ मिनिटं वाफवून घ्या. आवडीप्रमाणे नुसती

फोडणी, कांदा- टोमॅटो किंवा भाज्या घालून नूडल्स तयार करा.

नाचणीचे नूडल्स

साहित्यः एक कप नाचणीचं पीठ, प्रत्येकी अर्धा कप तांदूळ पीठ आणि मूग किंवा मसूर पीठ, चवीनुसार मीठ, पाणी दीड वाटी, तेल एक- दोन चमचे

कृतीः गव्हाच्या नूडल्सप्रमाणेच कृती करावी फक्त पाणी गरम वापरावं.

मोठ्या चाळणीत नूडल्स वाफवणं शक्य नसेल, तर इडली पात्र वापरून छोटे- छोटे साचे घालून इडलीसारखंही वाफवता येईल.

दोन्ही नूडल्सचे पीठ मळतानाच त्यात लाल तिखट, हळद किंवा मिरची, आलं, लसूण वाटून त्याचेही नूडल्स बनवले, तर नुसते खायलाही चांगले लागतात.

याशिवाय आयत्या वेळेस वर्षभराच्या वाळवणाच्या जाड शेवया (गहू किंवा मिश्र पिठाच्या) करून वाळवून वापरता येतील.

तांदूळ, साबूदाणा, रवा, गहू यांच्या कुरड्या भिजवून त्याही नूडल्ससारख्या वापरता येतात.

घरगुती टेस्टमेकर

रेडी टू इटच्या नूडल्सची खरी टेस्ट ही त्याच्या टेस्टमेकरमध्ये सामावलेली असते. आपणही घरी तितकेच चविष्ट टेस्टमेकर बनवू शकतो. हिंग, हळद, तिखट, मीठ आणि साखर अशा अगदी घरगुती टेस्टमेकरपासून, बाजारात मिळणारे मिक्स हर्ब्ज (ओरिगानो, पार्सले, थाइम, बेसिल इत्यादी), ब्लांड चव हवी असेल, तर नुसतं मीठ व मिरपूड असे टेस्टमेकर बनवता येतील. पास्ता सॉस वापरून पास्त्याप्रमाणेच नूडल्स बनवता येतील. खरंतर असे अनेक पदार्थ घरगुती पद्धतीनं तयार करता येतात ज्यामुळे शरीरास नुकसान तर नक्कीच होत नाही; पण जुन्या- नव्या गोष्टींची सांगड घालून चविष्ट आणि पौष्टीक पदार्थ बनवता येतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चवीनं खाणार त्याला पंडित देणार!

$
0
0

तेजस्विनी पंडित, अभिनेत्री

मटण बिर्याणी पाहिली, की मला बाबांची खूप आठवण येते. आजही त्यांच्या हातच्या बिर्याणीची चव आम्हाला प्रयत्न करूनही येत नाही. एक नजाकत होती त्यांच्या हातामध्ये. स्वयंपाकाची मापं त्यांच्या डिक्शनरीत नव्हती मुळी. मी आणि माझी बहीण त्यांच्याच तालमीत तयार झालोय. प्रथम त्यांनी आम्हाला चहा शिकवला. नंतर कुकर लावायला आणि नंतर थेट कॅरमल कस्टर्डच! आठवूनही मजा वाटते मनोमन. आजही त्यांची आठवण मनात आणि त्यांच्या हातच्या प्रत्येक पदार्थाची चव जीभेवर रेंगाळते आहे.

सोनेपे सुहागा म्हणतात तस्स आमच्या बाबतीत आहे. आईही अफलातून स्वयंपाक करते. पालक पुलाव, मसूर पुलाव, शेवग्याची आमटी ही तिची स्पेशॅलिटी. मलाही किचनमध्ये नवनवे प्रयोग करायला आवडतात. ग्रीन थाई करी माझी आवडती डिश आहे. आमच्या पूर्ण कुटुंबाला इतरांना खिलवण्यात एक वेगळीच मौज वाटते. माझ्या मित्रमंडळीची गँग नेहमीच गमतीनं म्हणते, की चवीनं खाणार त्याला पंडित देणार!

खाद्यभ्रमंतीमध्ये पुण्याला मी १०० टक्के गुण देते; कारण इथले अफलातून फूड जॉइंट. 'फाइन डाइन'मधला व्हाइट ग्रेव्हीतला पास्ता, आंबेडकर चौकातला ऑथेंटिक थाई जॉइंट, 'श्रेयस' मधील अप्रतिम व्हेज थाळी, सिंहगड रोडवरील 'सत्कार'मधील फिश थाळी, 'मासेमारी' आणि 'फिश करी राइस'मधील माशांचे लाजवाब प्रकार, डेक्कनला 'सुकांता'मधले नॉर्थ इंडियन पदार्थ, 'विष्णूजी की रसोई'तली शेंगदाणा चटणी, भाकरी ठेचा, अंबाडी आणि आळूची आमटी... नावं तरी किती अन् कुणाकुणाची घेऊ? शेवटी पुणे तिथे काय उणे म्हणतात हेच खरं!

शब्दांकनः निनाद पाटील

साहित्य : १/२ किलो सुरमई, १/४ टीस्पून ओवा, १ टीस्पून लाल तिखट, १/२ टीस्पून हळद, २ टेबलस्पून लिंबूरस, ३ टेबलस्पून तांदळाचं पीठ, १ टीस्पून आलं-लसूण पेस्ट मीठ चवीप्रमाणे, ४ टेबलस्पून तेल (शालो फ्राय करण्यासाठी)

कृती : माशाचे २" x २" तुकडे करा. माशाला आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, लिंबूरस, ओवा, मीठ लावून १ तास मॅरिनेट करून ठेवा. मॅरिनेट केलेल्या माशाचे तुकडे तांदळाच्या पिठात घोळवा. एका तव्यावर तेल गरम करा आणि तुकडे शालो फ्राय करून घ्या. लिंबू आणि मिठामुळे तुकड्यांना पाणी सुटेल त्यामुळे तांदळाचे पीठ चिकटून राहील. तुकडे चांगल्या प्रकारे फ्राय करता येतील. तुकडे पाच मिनिटांनंतर उलटे करा आणि दुसरी बाजूही फ्राय करून घ्या. गरज वाटल्यास थोडं तेल घाला. दोन्ही बाजू खरपूस भाजल्यावर जास्तीचं तेल टिश्यू पेपरनं टिपून घ्या आणि ग्रीन मिंट चटणीबरोबर सर्व्ह करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणेकराची साउथ इंडियन मेस

$
0
0

मराठी माणसानं फक्त पोहे, शिरा, साबुदाणा खिचडी, कोथिंबीर वडी आणि थालिपीठच विकायचं असं कोणी सांगितलंय? मराठी माणूस दाक्षिणात्य संस्कृती, भाषा आणि पदार्थ यांच्या प्रेमात पडल्यावर काय होतं, ते सुखदेव पुणेकर यांच्याकडे पाहिल्यानंतर समजतं. लोहगावमध्ये राहणाऱ्या या मराठी भाषकानं तमिळ संस्कृतीला अगदी आपलंसं करून टाकलंय.

पुणेकर १९८३ पासून या व्यवसायात आहेत. आधी हॉटेल उत्सव, मग ससूनमधील डॉक्टरांसाठी मेसचे डबे आणि नंतर २००४ पासून अय्यप्पा मंदिरासमोरील भवानी या साउथ इंडियन मेसची मॅनेजमेंट. पुढे एप्रिल २०११ पासून रास्ता पेठेत त्यांनी स्वतःची साउथ इंडियन मेस आणि स्नॅक्स सेंटर सुरू केलं नि दाक्षिणात्य मंडळींची मन जिंकण्यात ते यशस्वी झालेत.

सकाळी आठ-साडेआठ वाजल्यापासून नाश्त्याची लगबग सुरू होते. इडली, मेदूवडा, केशरी (म्हणजे गोडाचा शिरा), व्हेजिटेबल उपमा आणि व्हेन तसंच शर्करा पोंगल. व्हेन म्हणजे मीठ घालून केलेला आणि शर्करा म्हणजे स्वीट पोंगल. तांदूळ, मूगडाळ, काजू, जिरे, मिरे आणि तूप घालून बनलेला पोंगल चवीला एकदम टेस्टी.

साधारण बारापासून मिल्स मिळू लागतं. रात्री साडेनऊच्या सुमारास सगळा कारभार आटोपतो. जागा अगदी छोटी. दहा माणसं कशीबशी एकावेळी जेवायला बसतील इतकीच. त्यामुळे पार्सलवर विशेष जोर; पण तिथं बसून जेवण्यात असलेली मजा पार्सलमध्ये नाही, हे ताटं वाढायला लागल्यानंतर जाणवतं. रविवारी किंवा स्पेशल दिवशीच मिल्सला केळीची पान असतात.

सांबार, रस्सम, चटणी, दोन प्रकारच्या भाज्या, भरपूर अनलिमिटेड भात, ताक, दही, पापड आणि तळलेली मिरची. सांबर रोज वेगवेगळ्या प्रकारचं. कधी मुळा (बुळुंगी), टोमॅटो (तकाली), शेवगा (मुरुंगा), वंगायन (कांदा), कतरिका (वांगं), पुस्सनिका (भोपळा), परंगिका (तांबडा भोपळा) आणि मिक्स व्हेज सांबार... रस्सममध्येही व्हरायटी. टोमॅटो रस्सम, जिरा, कांदा-लसूण आणि किसलेल्या नारळाचं म्हैसूर रस्सम. भाज्यांमध्ये बीटरूट, गाजर, तांबडा भोपळा, बटाटा, पडवळ आणि सात प्रकारच्या भाज्या वापरून केलेली मिक्स भाजी (अवियल). कोशिंबीर, नारळ चटणी आणि स्पेशल टोमॅटो चटणी.

रविवारी विशेष जेवण असतं तेव्हा डाळवडा (परिप्पू वडा), मसाला वडा किंवा छोटा उडीद वडा यापैकी एकाची उपस्थिती असते. अवियलसह तीन भाज्या. साध्या भाताच्या संगतीला लेमन, कोकोनट, टोमॅटो किंवा पुलिओग्रे यापैकी एकासाठी राखीव जागा असते. शिवाय शेवई, सादम (भात) किंवा पाल पायसम (नारळाचे दूध) यापैकी एक गोड खीर आपल्या दिमतीला हजर असते. दक्षिणेत मिळतं तसंच अगदी घट्ट आणि दाट सांबार. परवा होतं टोमॅटो आणि कांद्याचं सांबार आणि म्हैसूर रस्सम. जिरे, मिरी, किसलेलं खोबरं आणि डाळीचं पाणी. यामुळे नेहमीच्या रस्समपेक्षा थोडं दाट.

पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असलेली तळलेली मिरची आणि टोमॅटो चटणीही समाधान देऊन जाते. मसाला भरून, दह्यात बुडवून नंतर वाळवून तळलेली ही मिरची हवीहवीशी वाटते. तशीच टोमॅटोची चटणी. टोमॅटो, कांदा आणि कोबी... सोबतीला तिखट-मीठ. ही चटणी पुन्हा पुन्हा मागवून खाल्ली नाही तरच नवल.

दोन-तीन वेळा दोन-दोन उलथने भात घेतल्यानंतर खरा दाक्षिणात्य जेवणाचा चाहता पूर्णविरामाकडे वळतो. (वाढताना एकदाच भात वाढू नये. दोनदा वाढावा, असे तमिळ खाद्यशास्त्र सांगते, हा सुखदेव पुणेकर यांचा दावा.) तुम्ही कॉफीचे निस्सिम भक्त असाल, तर मग स्ट्राँग कॉफी घेतल्याशिवाय तिथनं तुमचा पाय निघणं कठीण आहे. जेवणानंतर कॉफी उत्तम की नाही, वगैरे विचार करण्याच्या फंदात पडू नका. गर्रमागर्रम कॉफीचे घोट रिचवूनच सुखदेव पुणेकरांना 'नन्ड्री' म्हणून धन्यवाद द्या...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 1266 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>